मी वसंतराव – गाण्यापलीकडला अनुभव

खूप दिवसांनी का असेना पण मी शेवटी ‘मी वसंतराव’ हा चित्रपट बघितला. थियटेरमधे बघणे झाले नाही पण Jio Cinema वर बघायला सुद्धा उशीरच झाला. उशीरा सिनेमा बघून त्यावर काही लिहिण्यात हा फायदा असतो की बऱ्याच मंडळींनी सिनेमा बघितला असतो त्यामुळे कथानक माहिती असते. अशा वेळेला काही लिहिणे म्हणजे चित्रपट बघितल्यानंतर दोन व्यक्तीनी केलेल्या गप्पा असतात तेंव्हा गप्पाच मारु या. चित्रपट तसाही चरित्रपट आहे त्यामुळे शेवटी काय होणार आहे हे माहिती असतेच फक्त हा प्रवास कसा उलगडत जातो तेच बघण्यात खरी मजा आहे. ती मजा चित्रपट बघितल्यानंतरच कळते, तेंव्हा चित्रपट नक्की बघा आता टिव्हीवर देखील येतोय. पुढे काही प्रमाणात कथेचा उलगडा होतो म्हणून चित्रपट बघण्यावर काही परिणाम होईल असे वाटत नाही. चरित्रपट नेहमी फ्लॅशबॅकनीच का सुरु होतात ते एक कोडे आहे. हरीशचंद्राची फॅक्टरी अपवाद होता. वसंतराव देशपांडे यांचा जीवनपट देखील फ्लॅशबॅक मधेच उलगडत जातो. यातल्या फ्लॅशबॅक मधे एक वेगळेपण आहे आणि ते वेगळेपण फार महत्वाचे आहे हे चित्रपट बघितला तर लक्षात येते.

वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावरचा चित्रपट आहे म्हटल्यावर सुरवातीला गाण्यांविषयी बोलायलाच हवे. वसंतराव देशपांडे यांची कितीतरी प्रसिद्ध आणि अजरामर गाणी आहेत परंतु चित्रपटाचा दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी आणि संगीत दिग्दर्शक राहुल देशपांडे यांचा कल जुनी गाजलेली गाणी वापरण्यापेक्षा नवीन गाणी वापरण्यावर होता. जुनी नाट्यगीते वापरली नाही असे नाही परंतु फक्त चित्रपटाचा प्रवास पुढे न्यायलाच वापरली. तसेच त्यांची गाजलेली भावगीते, चित्रपट गीते वापरण्याचा मोह टाळला. जुनी प्रसिद्ध नाट्यगीते किंवा भावगीते वापरुन सिनेमाला प्रसिद्धि मिळविण्यापेक्षा दोघांचाही कल काहीतरी नवीन करण्यावर होता. यामुळे गंमत अशी झाली का तुमचे लक्ष वसंतराव देशपांडे यांच्या प्रवासावर केंद्रित होते. दुसरा फायदा हा झाला की बरीच नवीन गाणी ऐकायला मिळाली. ललना, राम राम जप करी सदा ही गाणी खूप गाजली मला स्वतःला खूप आवडला तो म्हणजे मारवा. मी स्वतः कितीतरी इनडोअर सायकलींग वर्कआऊट मारवा ऐकत केले. मुळात मी राहुल देशपांडे यांच्या गायनाचा खूप मोठा भक्त, फॅन वगैरे आहे. Rahul Deshpande Collective सुरु झाल्यापासून संगीताच जो मोठा कॅनव्हॉस उपलब्ध करुन दिला ते निव्वळ अप्रतिम. त्यामुळे या चित्रपटाच्या गाण्यांविषयी फार बोलण्याची माझी लायकी नाही. मला राम राम, पुनव रातीचा लावणी, गझल सारेच आवडले. शास्त्रीय संगीताच्या लयीसारखा चित्रपट सरकतो मधेच गायकांनी तानावर ताना घ्याव्या तशा काही घटना घडतात , तर कधी गायकाची एखादी हरकत जशी आवडते तसे पटकन काहाततरी चटका लावून जातं असा हा गायकाचा चित्रपट गायकाची सौंदर्यदृष्टी घेऊनच पुढे सरकतो.

मला सर्वात जास्त आवडले ते नागपूरातील वाडे. मोठे फाटक, ते मधे मंदिर, त्या खिडक्या, आजूबाजूला घरे त्यात राहणारे भाडेकरु किंवा मालक, खचत चाललेल्या भिंती असे खूप वाडे बघितले. साऱेच नातेवाईक महालात वाड्यात राहायचे त्यामुळे अशा खूप वाड्यात राहण्याचा , त्यांना भेट देण्याचा योग आला. ते सिनेमात बघताच त्या साऱ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. काही भाग नागपूरातील चिटणवीसाच्या वाड्यात शूट झाल्याचे वाचले. गेले कित्येक दिवस मी चिटणवीसांच्या वाड्यात गेलो नाही तो योग वसंतराव चित्रपटाने घडवून आणला. बाळकृष्ण मंगल कार्यालय अशी पाटी देखील दिसली. दुसरी आवडलेली गोष्ट म्हणजे नागपूर भागात वापरली जाणारी भाषा. टिव्ही मालिकांनी बोलीभाषांचा खूप प्रमाणात कचरा केला आहे. आबे, काहून असे शब्द वापरले की झाली नागपूरातील मराठी असा जो एक विचित्र समज पसरला आहे. हे शब्द वैदर्भी भाषेत नाही असे नाही परंतु ते बोलण्याची एक वेगळी पद्धत असते. यात आलोक राजवाडे ज्या पद्धतीने बोलला ना ते मस्त होतं. खूप दिवसांनी काहीतरी व्यवस्थित ऐकतोय असे वाटले. या दोन गोष्टिंमुळे सुरवातीच्या पाच दहा मिनिटातच मी चित्रपटाशी जोडल्या गेलो.

कथानकात दोन पातळीवर संघर्ष आहे. घर, संसार, मुलबाळं आणि संरक्षण खात्यातली नोकरी यात अडकलेली एक सर्वसाधारण व्यक्ती वसंतराव तर या सर्वसाधारण वसंतरावाच्या आता दडलेला असामान्य प्रतिभेचा गायक वसंतराव देशपांडे. हा गायक नोकरपेशा वसंतरावांना स्वस्थ बसू देत नाही. तो गायक सतत सांगत असतो यातून बाहेर पड पण वसंतराव मात्र कितीतरी वर्षे साच्यातच अडकून राहतात. संसार सांभाळायला पैसे लागतात आणि ते गायनातून येणार नाहीत याची त्या वसंतरावांना पूर्ण कल्पना असते. या संघर्षाला खतपाणी घालत असतात ते त्यांचे मित्रमंडळ जे वसंतरावांच्या गायकीचे प्रचंड चाहते असतात. बाहेरचे सांगत असतात पण खरा संघर्ष आत आहे वसंतराव विरुद्ध वसंतराव. ऑफिसला दांडी मारुन गाण्याच्या कार्यक्रमाला जाणे वगैरे चालूच असते. आपण संसारात अडकलोय ही मनात खोल दडलेली खदखद, खंत अरुणाचल मधल्या प्रसंगात प्रकर्षाने जाणवते. गरीबीतून संघर्ष करुन कुणी वर येतो हा संघर्ष खूपदा बघितलाय पण एका व्यक्तीचा स्वतःशीच सुरु असलेला कला विरुद्ध जीवन हा संघर्ष प्रथमच या प्रकारे कोणत्या चित्रपटात आला असेल.

दुसरा संघर्ष आहे तो एका गायकाचा, एका कलाकाराचा, हा संघर्ष दिनानाथ मंगेशकर यांचा होता तोच संघर्ष त्यांच्या शिष्याचा आहे. कुठल्यातरी साच्यात कलेला, गायनाला अडकविणारा समाज तर ती बंधने मोडून मुक्तपणे सर्वत्र संचार करुन बघणारा गायक कलाकार यांच्यातला हा संघर्ष आहे. दिनानाथ मंगेशकर यांना वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायची होती, ख्याल गायकी करायची होते पण लोकांना फक्त नाट्यगीते ऐकायची होती. कदाचित हीच समस्या पुलंची असावी कितीही प्रयत्न केला तरी पुल म्हणजे विनोदी लेखक ही प्रतिमा पुसणे पुलंना देखील जमले नाही. मराठी गायकानी इंग्रजी गाणे गायले तर नाक मुरडणारे येतात तुम्ही मराठीच गात जा. प्रयोगाशिवाय विज्ञान असो की कला पुढे जात नाही ते प्रयोग करायला कलाकार धजावत नाही किंवा कलाकारांनी असे धाडस केले तर ते स्वीकारायला समाज लवकर तयार होत नाही. सिनेमात दाखविले नाही परंतु कालांतराने हाच समाज त्या कलाकाराला हा तेचतेच करतो म्हणून नावे ठेवायला मागे पाहत नाही. साच्यात अडकलेल्या कितीतरी कलांकारांच्या बाबतीत असे घडले आहे म्हणूनच हा निरंतर चालणारा संघर्ष असला तरी कलाकारांनी आपले प्रयोग थांबवू नये असे मला वाटते. मला आवडणारा मारवा हा या संघर्षाचा फार महत्वाचा भाग आहे हे चित्रपट बघितल्यावर कळले. लाहोर मधे गेल्यानंतर वसंतरावांचा मामा सांगतात “आपल्याकडे शिकता येत ते इथे लाहोरला येऊन कशाला शिकायचे? तर इथले काहीतरी शिक.” अशी प्रवृत्ती हवी. मारवा शिकविणारा शिक्षक म्हणतो “तू मला कॉपी करु नको तर तू मारवा समजून घे मग गा.” मग ते शिक्षक मारवा समजावून सांगतात हीच गोष्ट दिनानाथ मंगेशकरांनी देखील सांगितलेली असते. मी पुलंनी वसंतरावांची घेतलेली मुलाखत ऐकली त्यात या प्रसंगाचा उल्लेख आहे. सिनेमा म्हटल्यावर थोडी नाट्यमयता जरी असली तरी तो मारवाचा प्रसंग तसाच घडला होता. एक राग विविध प्रकारे कसा गाता येतो हे गुरुने शिष्याला सांगितले होते यात गुरु अजून पुढची पायरी समजावून सांगतो. या आणि अशा प्रसंगातूनच वसंतरावांची गायकी तयार होत गेली. जी इतरांपेक्षा वेगळी होती म्हणूनच लोकांना स्वीकारायला जड जात होती. वाईट गाणे आणि वेगळे गाणे यात फरक असतो. वेगळा गातो म्हणजे तो वाईट गातो असे म्हणून जो बहिष्कार टाकला जातो तो मुळात लोकांचे कान तयार झाले नाहीत हे सांगणारा असतो. गायकी वाईट नसते. या वाक्यांनी जरी हा संघर्ष चित्रपटापुरता संपत असला ना तरी प्रत्यक्षात हा कधीच न संपणारा संघर्ष आहे. काही वेगळं स्वीकारायला वेळ लागतो हे खरे आहे.

जसा संघर्ष आहे तसेच सुंदर नात्यांच्या वीण देखील चित्रपटात आहे. चित्रपटात दाखविले की वसंतरावांना त्यांच्या आईने आपल्या सासरच्या इस्टेटीला लाथ मारुन वाढविले. त्यामुळे आई हे त्यांच आयुष्य व्यापून टाकणारी व्यक्ती होती या शंकाच नाही. वसंतरावांच्या भल्यावाईट प्रत्येक प्रसंगात त्याच्या आईची सोबत होती. त्यांची आई पण किर्तनात, भजनात गायची त्यामुळे गाण्याचे संस्कार होत गेले. लक्षात राहिला तो टांग्यातला प्रसंग. त्यावेळेला वसंतरावांची आई जे सांगते ते तिने आजवर जे सांगितले असते त्याच्या अगदी उलट असते. तू माझ्या संस्कारांमुळे असा वागतोय ते मला माहिती आहे पण आता मी सांगते यातून बाहेर पड. हीच वेळ आहे तुझ्या मनात जे चालले आहे ते कर, संघर्ष झाला, त्रास झाला तरी चालेल पण बदल स्वतःला, मी जसे शिकविले, सांगितले तसा वागू नको तर तुला हवे तसे वाग. वसंतरावांच्या आईंचा देवावर विश्वास नव्हता परंतु हळूहळू मुलासाठी तेही करायला लागतात. सासूबाई आणि सूनबाईमधला मैत्रीचा धागा तर जबरदस्त आहे.

वसंतरावांची गायकी आवडणारी जी त्यांची मित्रमंडळी असते त्यात एक मोठे नाव असते ते म्हणजे पुल देशपांडे. वसंतराव आणि पुल याच्या मैत्रीचे खूप प्रसंग चित्रपटात आहेत मला त्याहून जास्त आवडले ते वसंतरावांची आई आणि पुल यांच्यातील नाते. ती बाई पुलंना लाटणे फेकून मारायला कमी करीत नाही. गरज पडल्यास तीच बाई पुलंना सांगते ‘ए भाई काहीतरी कर आता’. एक छोटासा प्रसंग माझ्या लक्षात राहिला पुल आणि वसंतराव एका दुकानात काहीतरी विकत घेत असतात. त्याआधी कुणीतरी वसंतरावांना बोललेले असते आणि वसंतरावांच्या डोक्यात तो राग असतो. अशा वेळी कुणीतरी पुलंची स्वाक्षरी घ्यायला येतो. दुसरी व्यक्ती पुलंनी नाटकाच्या दुसऱ्या अंकात काय बदल करायला हवे ते सांगतो आणि पुल त्याला पुढल्या वेळी लक्षात ठेवीन म्हणून टाळतात. पुल वसंतरावांना म्हणतात “हे पुणे आहे इथे प्र्त्येक विषयात प्रत्येकाला मत असते. लोकांच मनावर घेऊन चालत नाही.” पुल आणि वसंतरावांमधला अप्रतिम प्रसंग म्हणजे पुल वसंतरावांना त्यांनी पूर्ण वेळ गायकी करावी असा आग्रह करीत असतात परंतु वसंतराव नाही म्हणतात. शेवटी चिडून वसंतराव म्हणतात “माझ तुझ्यासारख नाही भाई मी नाही सोडू शकत.” त्यानंतर कुणीच काही बोलत नाही आणि ते न बोलणे बरेच काही सांगून जाते. त्यांच्यातल नात हे असेच चाळीस वर्षे होत.

तसाच सुंदर धागा आहे तो बेगम अख्तर आणि वसंतराव यांच्यातील मैत्रीचा. अतिशय नाजूक वीण खूप छान हाताळली आहे. तीच गोष्ट पुरुषोत्तम दारव्हेकर आणि वसंतराव यांच्यातल्या दुव्याची. तो चहाच्या टपरीवरील प्रसंग अप्रतिम आहे. हा प्रसंग प्रत्यक्षात घडला की लेखकाने लिहिला हे सांगणे कठीण आहे. वसंतरावांच्या आयुष्याला कलाटणी देणारा तो प्रसंग खूप मस्त वाटला. लांब पल्ल्यांच्या संवादांपेक्षा हा चित्रपट अशा छोट्या प्रसंगातून फुलत जातो म्हणूनच चित्रपटातील वसंतरावांचा प्रवास सामान्य माणसांसारखा जिवंत वाटतो कृत्रीम भासत नाही. सप्रे गुरुजींच्या शाळेत वसंतरावांना घालायचा प्रसंग जसा वसंतरावांनी सांगितला तसाच आहे. तो पाऊस पडणे, मुलाने गायन शाळेतील गाणे म्हणणे, शिक्षकांनी मुलाला शिकविणे हल्ली असे शिक्षक भेटणार नाहीत. मला ते वाक्य फार आवडले “माझ्या आयुष्यातील चांगल्या घटना घडल्या तेंव्हा खूप पाऊस आला.” मी स्वतः हे वाक्य बऱ्याचदा म्हणतो. एका शाळेत वसंतराव गायला जातात पण तबलजी आलेले नसतात. तेव्हा तिथल्या एका मुलाला घेऊन वसंतराव गाणं म्हणतात. त्या मुलाला फक्त तीनताल वाजवता येत असतात. तिथे एका मुलाने त्यांचे गाणे ऐकले त्याला त्यांचे गाणे फार आवडले. पुढे जाऊन तो मुलगाच त्यांच्या आयुष्याला कलाटणी देऊन जातो. जुन्या पिढिचे कान एका विशिष्ट प्रकारच्या गायकीसाठी तयार झाले होते. नवीन पिढित तसे नव्हते. ते वेगळेपण नावीण्य स्वीकारत गेले आणि त्या पुढच्या पिढिने मग वसंतराव देशपांडे या गायकाला मोठे केले असा संदेश चित्रपट सहज देऊन जातो.

चित्रपटात दोष नाहीत असे नाही पण त बोचत नाही. दोष बोचत नसतील तर काहीतरी दोष लिहायचे म्हणून लिहिण्यात काय अर्थ आहे. कलाकारांनी साजेसा अभिनय व्यवस्थित केला. चित्रपट संपल्यानंतर जर का राहुल देशपांडे यांचा वसंतराव पुष्कराज चिरपुटकर च्या पुलंपेक्षा लक्षात राहिला असता तर ते दिग्दर्शाकाचे आणि कलाकाराचे अपयश ठरले असते. तसे होत नाही त्यामुळेच अभिनय, कलाकार, कॅमेरा या मला न समजणाऱ्या गोष्टिंविषयी मी काही सांगू शकत नाही. गाण्याच्या बाबतीत माझी बोंबाबोंबच आहे त्यामुळे त्याविषयी फार न लिहिलेले बरे. वसंतराव देशपांडे या गायकावरील चित्रपट असल्याने यात तब्बल बावीस गाणी आहेत. चित्रपटात बराच काळ गायन आहे पण ते उगाच वाटत नाही. चित्रपटातील गाण्याइतपत किंबहुना मी म्हणेल त्याहीपेक्षा जास्त महत्वाचे आहे ते वसंतराव या व्यक्तीचा प्रवास, संघर्ष समजून घेणे. एक सामान्य माणूस त्याच्या आत दडलेला असामान्य गायक ज्याला फक्त गायचे नाही तर साऱ्या चौकटी मोडून गायचे आहे, त्यांच्या मनातली ही खदखद समजून घेणे अधिक महत्वाचे वाटते. हा संघर्ष जर समजला तरच वसंतराव देशपांडे मोठे गायक का झाले हे समजायला सोपे पडते. त्यासाठी मी वसंतराव हा एक वेगळा अनुभव नक्कीच घ्यायला हवा.