ग्रेट गेम भाग -२

The Great Game

हा ग्रेट गेम या पुस्तकाच परिचय आहे. पुस्तकाचा परियच करुन देताना प्रत्यक्षात ग्रेट गेम म्हणजे नक्की काय होते तेही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा शंभराहून अधिक वर्षाचा इतिहास आहे म्हणूनच काही भागात हा पुस्तक परिचय देत आहे.

प्रवास– ग्रेट गेममधे प्रवासाचा वापर एखाद्या सैनिकी शस्त्रासारखा केला होता. तेच शस्त्र लेखकानेही तितक्यात ताकदीने या पुस्तकात वापरले आहे. या पु्स्तकातील एकेक प्रकरण म्हणजे एका प्रवासाचे वर्णन आहे. तो प्रवास कधी आक्रमणासाठी केला असतो, कधी त्यात हेरगिरी असते, कधी मुत्सदेगिरी असते तर कधी फक्त साहसी प्रवास असतो. हेन्री पोटिंगर, मूरक्राफ्ट, वाटकेविच, इग्नेटीव्ह, शेक्सपियर, अलेक्झांडर बर्नेस, जेम्स अॅबॉट, बर्नबी, जॉर्ज हेवर्ड, कर्झन, Younghusband अशा कितीतरी प्रवाशांचे प्रवास वाचताना अंगावर काटा येतो. त्याकाळात नकाशे नव्हते, उंटाच्या तांड्यावरुन हे प्रवास व्हायचे. जिविताची, मालमत्तेची सुरक्षितता हा प्रवासातील सर्वात मोठा धोका होता. तुर्कमानच्या टोळ्या, बलुची टोळ्या, किंवा स्थानिक टोळ्या मध्य आशियातील विविध भागात सक्रिय होत्या. लूटमार, जीवित हानी, किंवा गुलाम बनविणे हेच काम या टोळ्या करीत असत. तुर्कमानच्या टोळ्या प्रवाशांना पकडून त्यांची खिवा, किंवा बुखाराच्या गुलाम बाजारात विक्रि करीत असत. या तुर्कमान टोळ्यांनी कास्पियन समुद्रात मासेमारीला आलेल्या रशियन मच्छिमारांना पकडून गुलाम म्हणून विकले होते. दुसरा मोठा धोका होता अतिशय खडतर परिसर आणि तेथील हवामानाचा. हिंदुकुश पर्वतांच्या रांगा, लदाखच्या उत्तरेकडील पर्वतरांगा, पामिरच्या पर्वतरांगा या भागातील प्रवास तेथील थंडी आणि दुर्गमतेमुळे कठीण होता. विस्तीर्ण वाळवंटामुळे मध्यआशियातले प्रवास खडतर होते.

साहसी प्रवाशांच्या प्रवासाचा मुख्य उद्देष होता नकाशे तयार करणे. मध्य आशियातला बराचचा भाग हा ब्रिटिशांच्या किंवा रशियाच्या नकाशावर नव्हता. त्यामुळे शत्रूचे सैन्य कोणत्या मार्गाने येऊ शकते किंवा तुमचे सैन्य कुठल्या मार्गाने प्रवास करु शकते हे समजण्यासाठी नकाशांची गरज होती. नकाशे मिळविण्यासाठी केलेले प्रवास बऱ्याचदा फार कमी ताफा सोबत घेऊन केलेले होते त्यामुळे त्यात खूप धोका होता. प्रवासातला हा धोका आणि थरार हीच या पुस्तकाची ताकत आहे. यातील प्रवास वर्णन कांदबरीसारखे लिहिले आहे. ‘तो हेराथला जाणाऱ्या ताफ्यात सामील झाला. त्याने सांगितले उद्या माझ्या सोबत माझा मित्र येणार आहे.’ अशा मांडणीमुळे हे इतिहासाचे पुस्तक असले तरी रंजक आणि थरारक वाटते. यातील काहींचे प्रवास यशस्वी ठरले, त्यांनी त्यांच्या देशाला महत्वाची माहीती पुरविली. तर काही प्रवासांचा भयानक अंत झाला. मूरक्राफ्ट ऑक्सीस नदीच्या तीरावर मेला, जॉर्ज हेवर्डची क्रूरपणे कत्तल करण्यात आली. प्रवास हा यशस्वी होईलच याची खात्री नसल्याने प्रवास वाचण्यातली उत्कंठा कायम राहते.

ब्रिटन आणि अफगाणिस्तान: ग्रेट गेमच्या इतिहासातील सर्वात काळा आणि रक्तरंजित इतिहास म्हणजे ब्रिटन आणि अफगाणिस्तान यांच्यातील संघर्ष. अलेक्झांडर बर्नेस या ब्रिटिश अधिकाऱ्याने सिंधू नदीतून लाहोरपर्यंत प्रवास केला. त्यात त्याने सिंधूच्या आसपासच्या भागाची पाहणी केली, त्याची ब्रिटिशांना पुढे सिंध पांत ताब्यात घेताना मदत झाली. लाहोरवरुन तो पुढे काबूल आणि बुखारा पर्यंत गेला. त्याचा बुखारा पर्यंतचा प्रवास इतका गाजला कि त्याला बुखारा बर्नेस सुद्धा म्हणत होते. तो ब्रिटिश राजदूत म्हणून अफगाणिस्तानात कार्यरत होता. त्यावेळेला तेथे दोस्त महमदचे राज्य होते. दोस्त महमद रशियाची मदत घेतो आहे असा संशय ब्रिटिशांना आला होता. १८४२-४३ चा काळ होता. पुस्तकात म्हटल्याप्रमाणे ज्यांनी कधी अफगाणिस्तान बघितले नाही अशा लोकांनी काबूलवर आक्रमण करुन तेथे ब्रिटिशांचा मांडलिक राजा नेमावा असा सल्ला दिला. त्याला कलकत्ता आणि लंडन दोन्हीनी मान्यता दिली. गझनीला सोडले तर इतर ठिकाणी ब्रिटिश सैन्याला फार विरोध सहन करावा लागला नाही. योजनेप्रमाणे ब्रिटिशांनी दोस्त महमदच्या भावाला गादीवर बसले, दोस्त महंमदला भारतात अज्ञात स्थळी पाठविण्यात आले. काबूल फत्ते झाले, इथे शांतता आहे असा संदेश लंडन आणि कलकत्त्याला पोहचला. काबूलच्या गल्ल्यांमधे मात्र काहीतरी वेगळेच शिजत होते. दिवसेंदिवस ब्रिटिशांविरुद्ध रोष वाढत होता. एकदिवस या साऱ्याचा उद्रेक झाला. बर्नेसमुळे ब्रिटिश अफगाणिस्तानात पोहचले अशी अफगाणी लोकांची भावना होती म्हणून अफगाणी बंडखोरांनी बर्नेसची हत्या केली. ब्रिटिशांच्या छावनीला वेढा घातला. युद्ध झाले परंतु संख्येने अफगाण ब्रिटिश सैन्यापेक्षा जास्त होते. ब्रिटिश माघारी परतायला लागले. हेच ते इतिहासातील काळे पान. जवळ जवळ साडेचार हजार ब्रिटिश ज्यात सैनिक, नोकर, मुल, बायका सामील होते काबूलवरुन जलालाबादकडे निघाले. जलालाबादला ब्रिटिशांची छावणी होती. या साडेचार हजारापैकी फक्त एक व्यक्ती डॉ. विल्यम बेफोर्ड जलालाबादला पोहचू शकली. बाकी सारे प्रवासात मारल्या गेले. ब्रिटिशांना खिंडीत गाठून अफगाणांनी हल्ले केले. ब्रिटिशांनी याचा बदला लवकरच अतिशय क्रूरपणे घेतला. परत दोस्त महमदला काबूलच्या गादीवर बसविले. ज्याला हटविण्यासाठी हा रक्तपात घडला होता त्यालाच परत गादीवर बसविले. ब्रिटिशांची सैनिक छावणी तेथून हलविली.

दोस्त महंमदच्या हयातीत अफगाणिस्तान आणि ब्रिटिश यांचे संबंध व्यवस्थित होते पण त्याच्या मृत्युनंतर काबूलमधे यादवी झाली. बरेच राजे आले आणि गेले. १८८० मधे ब्रिटिश परत एकदा अफगाणिस्तानात आले. परत काबूल जिंकले. ब्रिटिश मध्यस्थी आणि मुत्सदेगिरीचे जगभर कौतुक झाले. परत एकदा कॅवनेरी या ब्रिटिश अधिकाऱ्याची काबूलमधे नेमणूक करण्यात आली. परत एकदा ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या झाली. ब्रिटिशांच्या छावनीतील सैन्याने यावेळेला परत जाण्यापेक्षा युद्ध करणे पसंत केले. अर्थात पराभव झाला. यावेळेला जनरल फेड्रिक रॉबर्टस फार मोठी फौज घेऊन मागेच होता. त्याने काबूल जिंकले. अफगाणी बंडखोरांना फार दूर पर्यंत हुसकवुन लावले. काबूलमधे या घडामोडी घडत असतानाच हेराथच्या शहाने हेराथवरुन ब्रिटिशांच्या कंदहारच्या छावनीवर हल्ला करायला सैन्य पाठविले. त्या सैन्याला थोपवायला ब्रिटिशांच्या फौजा कंदहारमधून निघाल्या. मैवांद (Maiwand)येथे ब्रिटिश आणि हेराथच्या शहाच्या सैन्यात घनघोर युद्ध झाले. हिच ती प्रसिद्ध मैवांदची लढाई. ब्रिटिशांचा पराभव झाला. अफगाणी सैन्याने पुढे येऊन कंदहारला वेढा घातला. जनरल रॉबर्टसने प्रचंड वेगाने ब्रिटिश सैन्याच्या हालचाली केल्या. काबूल ते कंदहार हे अंतर कापायला त्याकाळी साधारणतः तीस दिवस लागायचे. जनरल रॉबर्टस आणि त्याच्या सैन्याने हे अंतर फक्त एकवीस दिवसात कापले. रॉबर्टसचे सैन्यापुढे अफगाणी फौजाचा टिकाव लागणे शक्य नव्हते. ब्रिटिशांनी दोस्त महंमदचा नातू अब्दुल रहमान याला काबूलच्या गादीवर बसविले. असे म्हणतात कि रशियाला हेच करायचे होते. रशियाला अशी संधी देऊन त्यांना अफगाणिस्तानात प्रवेशाची संधी देण्याएवजी ब्रिटिशांनी तेच करुन रशियाला दूर ठेवले.

क्रमशः